पाश्‍चिमात्य लष्कराच्या माघारीने अफगाणिस्तानचे अस्तित्व धोक्यात येईल – अफगाणिस्तानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अब्दुल्ला

काबुल – गेल्या चोवीस तासात अफगाणी लष्कराने देशभरात केलेल्या कारवाईत तालिबानच्या 258 दहशतवाद्यांना ठार केले. तर तालिबानने पाकतिकामधील पूल उद्ध्वस्त केला. युरोपिय देशांची अफगाणिस्तानातील सैन्यमाघार पूर्ण होत असून 4 जुलैपर्यंत अमेरिकेचे नियोजित लष्करही माघारी परतणार असल्याच्या बातम्या आहेत. तालिबानचे वाढते हल्ले आणि पाश्चिमात्य देशांची सैन्यमाघार यावर अफगाणिस्तानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अब्दुल्ला अब्दुल्ला यांनी चिंता व्यक्त केली. ‘पाश्चिमात्य लष्कराच्या माघारीमुळे अफगाणिस्तानचे अस्तित्व, सुरक्षा आणि ऐक्य धोक्यात आले आहे’, असा इशारा अब्दुल्ला यांनी दिला.

गेल्या काही दिवसांमध्ये तालिबानने अफगाणिस्तानात जोरदार लष्करी धडक मारली आहे. तालिबानसमोर अफगाणी जवानांनी शरणांगती पत्करल्याच्या व पळ काढल्याच्या बातम्या आहेत. तर अफगाण लष्कर मात्र तालिबानचे हल्ले थोपविल्याचे सांगत आहे. गुरुवारी अफगाणी लष्कराने तालिबानच्या विरोधात 15 प्रांतांमध्ये कारवाई केल्याची माहिती दिली. या संघर्षात तालिबानचे 258 दहशतवादी ठार, तर 142 जण जखमी झाले. तर हेरात प्रांतात लष्कराने तालिबानला माघार घेण्यास भाग पाडल्याचे दावे अफगाणी माध्यमांनी केले.

Read more: http://newscast-pratyaksha.com/marathi/with-withdrawal-of-foreign-troops-afghanistan-existence-is-in-danger-says-abdullah-abdullah/